प्रहार, रविवार, दि. 26 जानेवारी 2014 'विषदेखील अमृत होऊ शकते'.....
रविवार, दि. 26 जानेवारी 2014
विषदेखील अमृत होऊ शकते.....
आज परिस्थिती अशी आहे, की कोणताही शेतकरी निव्वळ शेतीच्या भरोशावर जगू शकत नाही.शेतीसोबत काहीतरी जोडधंदा असेल तरच त्याला थोडी फार आर्थिक स्थिरता लाभू शकते. असाजोडधंदा अनेक प्रकारांतून, अनेक माध्यमांतून त्याला उपलब्ध करून दिला जाऊ शकतो. त्यासाठीआर्थिक मदत, प्रोत्साहन आणि प्रशिक्षण देण्याची तयारी सरकारने दाखवायला हवी.
ही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात एक छोटीशी बातमी आली होती. सापाच्या विषाची तस्करी करणाऱ्यांना अटक आणि त्यांच्याकडून तीन कोटींचे सर्पविष जप्त, अशा आशयाची ती बातमी होती. माझ्या दृष्टीने ती छोटीशी बातमी लक्षवेधक होती. आपल्या देशात साप मोठ्या प्रमाणात आहेत. सापाचे विष एरवी अत्यंत धोकादायक असले, तरी विविध जीवरक्षक औषधींमध्ये त्यांचा वापर केला जातो. विषारी साप चावल्यानंतर उपचार म्हणून जी 'अॅण्टी व्हेनम' लस दिली जाते तीदेखील सापाच्या विषापासूनच तयार केलेली असते. सापाचे विष एखाद्या घोड्याला थोडे थोडे टोचले जाते. विषाचे प्रमाण अतिशय कमी असल्यामुळे घोड्याच्या शरीरात ते विष पचविले जाते. हळूहळू विषाचे प्रमाण वाढविले जाते, त्यामुळे घोड्याच्या शरीरात विषाचे प्रतिजैविक तयार होते. हेच प्रतिजैविक 'अॅण्टी व्हेनम' म्हणून वापरले जाते. इतरही अनेक प्रकारची विष प्रतिरोधक औषधे किंवा जीवरक्षक औषधे सापाच्या विषापासून तयार केली जात असल्यानेच सापाच्या विषाला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी किंमत मिळते. भारतात जंगलसंपदा चांगली आहे, त्यामुळे इथे सापांचे प्रमाणही अधिक आहे; परंतु इथे सापाचे विष काढणे, त्याचे दात काढणे, सापाला बंदिस्त करून ठेवणे कायद्याने गुन्हा आहे; मात्र सापाला ठार मारणे गुन्हा नाही, हाही विनोदच म्हणायला हवा.
सर्पविषाची तस्करी केली जाते. ही तस्करी रोखायची असेल आणि सापांचे जतन करायचे असेल तर हा व्यवसाय काही अटींवर अधिकृत करून अनेक बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देता येईल. आपल्याकडे साप दिसला, की त्याला मारण्याचा प्रयत्न केला जातो. लाखो नव्हे अगदी करोडो साप अशाप्रकारे दरवर्षी मारले जातात. त्यामागे मुख्य कारण सापाबद्दलची भीती आणि अज्ञान हेच आहे. साप दिसला, की तो विषारीच असेल असा विचार करून त्याला मारले जाते. भारतात सापाच्या असंख्य जाती आढळतात; परंतु त्यापैकी केवळ चारच जातीचे साप माणसाच्या दृष्टीने जीवघेणे विषारी असतात. नाग, मण्यार, फुरसे आणि घोणस या चार जातीच विषारी आहेत; परंतु अडचण ही आहे, की दिसलेला साप विषारी आहे की नाही हे चटकन सांगता येत नाही. त्यामुळे सरसकट सगळे साप मारले जातात. धामण जातीचा साप तर शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे, कारण उंदीर हे त्याचे मुख्य भक्ष्य आहे. धामण जातीचा साप इतर विषारी सापाच्या तुलनेत लांबलचक आणि मोठा असतो. साप जितका मोठा तितका तो भयंकर विषारी, अशी समजूत अगदी दृढ असल्याने धामण साप दिसला, की हमखास मारल्या व्यवहारात गुंतलेले असतात असे म्हणता येणार नाही, परंतु जे लोक यात गुंतले आहेत ते अतिशय क्रूरपणे सापाचे विष, जे त्यांच्या जबड्यात मागच्या बाजूला पिशवीत असते काढतात आणि त्या प्रक्रियेत सापाचा जीव जातो. हा प्रकार टाळायचा असेल तर सर्पमित्रांना सापाचे विष काढण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासोबतच हा व्यवसाय अधिकृत केला, सापाचा जीव जाणार नाही अथवा त्याला कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही, या अटीवर त्यांना साप पाळण्याची आणि सर्पविषाचा अधिकृत व्यापार करण्याची परवानगी दिली, तर सापांचे आणि त्या माध्यमातून पर्यावरणाचेही संरक्षण होईल, शिवाय बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल, सर्पविष मूल्यवान असल्यामुळे त्याच्या निर्यातीतून मोठ्या प्रमाणात परकीय चलनही मिळू शकेल. यासाठी विशेषत: ग्रामीण भागातील तरुणांना साप पकडण्याचे, विषारी साप ओळखण्याचे, त्यांचे विष काढण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. व्यवसायाचे एक नवे क्षेत्र त्यातून उपलब्ध होऊ शकते. खेड्यापाड्यात असे सर्पमित्र तयार झाले किंवा प्रत्येक घरातील किमान एका मुलाला किंवा मुलीला जरी असे साप ओळखण्याचे व पकडण्याचे, त्याचे विष काढण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले, तर लोकदेखील साप दिसल्यावर त्याला मारण्याऐवजी या सर्पमित्रांना बोलावतील, सापांची विनाकारण हत्या होणार नाही. सर्पविषाच्या तस्करीसाठी हकनाक साप मारले जाणार नाहीत. अशाच स्वरूपाचा मुद्दा मी हरणे, डुक्कर, रोही इ. जंगली प्राण्यांच्या संदर्भातही मांडला होता. शेतकऱ्यांना या जंगली प्राण्यांचा प्रचंड उपद्रव होतो. हरणांचे कळप उभ्या पिकांची नासाडी करतात. वन्य जीव विषयक कडक कायद्यामुळे शेतकरी या प्राण्यांचा बंदोबस्त करू शकत नाही. त्यांना पकडताही येत नाही आणि मारताही येत नाही. शेतकऱ्यांच्या पिकांकडे या प्राण्यांची धाव असते कारण त्यांना जंगलात पुरेसा चारा मिळत नाही किंवा जंगलाचे प्रमाण रोडावले आहे. अशा परिस्थितीत शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, इमू पालनाच्या धर्तीवर शेतकऱ्यांना किमान हरिण पालनाची परवानगी दिली आणि एक विशिष्ट संख्या कायम राखून अधिकच्या हरणांची कातडी, मांस आदींची निर्यात करण्याची किंवा देशातच विकण्याची परवानगी दिली तर हरणांची संख्या नियंत्रणात राहील, त्यांचे अस्तित्वही सुरक्षित राहील आणि शेतकऱ्यांना एक चांगला जोडधंदा, खरे तर मुख्य धंदा उपलब्ध होईल.
अशा अनेक संधी, अनेक पर्यायांतून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते. रोजगार निर्मिती, परकीय चलन आणि वन्य जीव तसेच पर्यावरणाचे संरक्षण असा तिहेरी लाभ यातून होऊ शकतो, परंतु सरकार त्याकडे गांभीर्याने पाहायला तयार नाही. नोकरशाहीला यातून आपला कसा फायदा होऊ शकतो याची चिंता असते, तर सत्ताधाऱ्यांना प्रत्येक गोष्टीकडे राजकीय दृष्टीने पाहण्याची सवय लागली आहे. एकूणच नोकरशहा आणि राजकारणी विकास, रोजगार निर्मितीच्या बाबतीत कोणतेही नाविन्यपूर्ण प्रयोग करायला तयार नसतात. खरे तर अशा अनेक छोट्या-मोठ्या उपायाने देशातील बेरोजगारी, देशाचे दारिद्र्य सहज घालविता येईल, परंतु हे केले जात नाही. आज परिस्थिती अशी आहे, की कोणताही शेतकरी निव्वळ शेतीच्या भरोशावर जगू शकत नाही. शेतीसोबत काहीतरी जोडधंदा असेल तरच त्याला थोडी फार आर्थिक स्थिरता लाभू शकते. असा जोडधंदा अनेक प्रकारांतून, अनेक माध्यमांतून त्याला उपलब्ध करून दिला जाऊ शकतो. त्यासाठी आर्थिक मदत, प्रोत्साहन आणि प्रशिक्षण देण्याची तयारी सरकारने दाखवायला हवी. तसे काही केले, तर सापाचे विषदेखील मरू घातलेल्या शेतकऱ्यासाठी अमृत ठरू शकते, परंतु सरकार या सगळ्याच बाबतीत कमालीचे उदासिन असल्याचे दिसते. खरे तर उदासिन सरकार आणि भ्रष्ट नोकरशाही हेच शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी जालीम विषाचे काम करीत आहे, असे म्हणावयास हरकत नाही. या विषावरचा उतारा आता शेतकऱ्यांच्या तरुण पोरांनाच शोधावा लागणार आहे. पुढच्या पिढ्या बरबाद व्हायच्या नसतील तर या पिढीला त्याग आणि संघर्ष करावाच लागेल, ती वेळ आणि तशी परिस्थिती आता आली आहे, हे मात्र निश्र्चित!
Comments
Post a Comment