मध्यप्रदेश शासनाच्या `भावांतर भुगदान योजने'च्या धर्तीवर सुधारित योजना राज्यातही लागू करा- प्रकाश पोहरे

रविवार, दि.22 ऑक्टोबर 2017
मध्यप्रदेश शासनाच्या `भावांतर भुगदान योजने'च्या
धर्तीवर सुधारित योजना राज्यातही लागू करा- प्रकाश पोहरे
0 किमान हमीभाव निश्चित मिळण्याची खात्री 0 शेतकऱ्यांच्या आर्थिक बाजूचा झाला गुणात्मक विचार

या शेतमालाचा समावेश
भावांतर भुगदान योजनेमध्ये सोयाबीन, भुईमूग, तीळ आणि रामतीळ या तेलवर्गीय पिकांचा आणि मका, उडीद, मूग तूर या शेतमालाचा अंतर्भाव केला आहे. या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर शेतकरी हा मध्यप्रदेशचा मूळ रहिवासी असणे अनिवार्य आहे. सदरहू शेतमाल विक्री करण्याचा कालावधीही शासनाने निश्चित करून दिला असून त्याच कालावधीदरम्यान शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाजार समित्यांमध्ये विकावा लागणार आहे.
21 ऑक्टोबर (प्रतिनिधी) अकोला:
शेतमालाचे बाजारभाव हमी भावापेक्षा कमी असतील तर तफावतीची रक्कम शासनातर्फे देण्याची योजना मध्यप्रदेश शासनाने लागू केली आहे. भावांतर भुगदान योजना या नावाने प्रसिद्ध झालेली सदर योजना शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूपच उपयोगाची असून, शेतमालाचे बाजार भाव कोसळल्यांनतर संकटमोचकाची भूमिका ती अदा करू शकते अशा शब्दात शेती प्रश्नाचे अभ्यासक प्रकाश पोहरे यांनी या योजनेचे स्वागत केले आहे. ही योजना तर्कसंगत असून यामध्ये काही किरकोळ बदल करून महाराष्ट्रामध्ये तातडीने लागू करण्याची मागणीही त्यांनी आज केली. या योजनेची अंमलबजावणी योग्य पद्धतीने लागू झाल्यास शेतमालास किमान हमीभावाइतके दर मिळण्याची खात्री निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक बाजूचा गुणात्मक विचार करणारी  स्वतंत्र भारताच्या इतिहासातील ही पहिलीच योजना ठरावी, असे भावनात्मक मत पोहरे यांनी व्यक्त केले.
'काय आहे भावांतर भुगदान योजना
कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शेतकऱ्यांनी विकलेल्या शेतमालाचे दर हमीभावापेक्षा कमी असतील तर हमीभाव आणि विक्रीचे मूल्य यातील तफावतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात राज्य सरकारतर्फे जमा केली जाणार आहे. यामुळे मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला किमान हमीभावा एवढा दर खात्रीनेे मिळण्याची सोय झाली आहे.
असा मिळेल लाभ

भावांतर भुगदान योजना दोन प्रमुख अटींच्या भोवती फिरणार आहे.   ही बाब येथे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, मध्यप्रदेशातील बाजार समितीमध्ये प्रत्येक शेतमालासाठी राज्यशासनाद्वारे  मॉडेल विक्री दर निश्चित केलेला असतो. भावांतर योजने अंतर्गत जर शेतमालाचा दर हमीभावापेक्षा कमी आणि मॉडेल विक्री दरापेक्षा कमी असेल तर शेतकऱ्यांना मॉडेल विक्री दर आणि हमीभाव यांच्यातील तफावतीची रक्कम मिळेल. आणि जर शेतमालाचे दर हमी भावापेक्षा कमी आणि मॉडेल दरापेक्षा जास्त असेल तर शेतमालास मिळालेला विक्री दर आणि हमीभाव याच्यातील फरकाची रक्कम राज्य शासनातर्फे अदा करण्यात येणार आहे. मॉडेल विक्री दरापेक्षा हमीभावाचा दर कमी असेल अशा परिस्थितीत ही योजना लागू होणार नाही.

Comments

Popular posts from this blog

प्रहार, रविवार, दि. 19 ऑक्टोबर 2014 “लोकप्रतिनिधींचेही सरकारी कार्यालय असावे”

प्रहार,रविवार, दि. 26 ऑक्टोबर 2014 अनेकांची औकात आणि कुवत स्पष्ट करणारी निवडणूक!

शेतकऱ्यांप्रती कळवळा खरा असेल तर ...ही हिंमत दाखवा! प्रहार रविवार, दि. 28 मे 2017